अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 4 - बिरबल सापडला - Birbal Sapadla

Rajan garud
0

 


एकदा, एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलची चर्चा चालू होती व क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबरने बिरबलला दरबारात येण्यास बंदी घातली व राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल राज्य सोडून एका गावात गेला.

परंतु, काही दिवसांतच अकबरला दरबारात बिरबलची अनुपस्थिती जाणवू लागली. वेळोवेळी अकबर बिरबलची आठवण काढत असे व चिंता करत असे. परंतु, बिरबलचा ठावठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. अकबरने बिरबलला परत आणण्यासाठी एक युक्ती बनवली.

त्याने पूर्ण राज्यात दवंडी पिटविली की, ‘जो माणूस सावलीतही उभा नसणार व उन्हातही नसणार म्हणजेच जो व्यक्ती अर्धे ऊन व अर्ध्या सावलीत चालेल व जो अत्यंत उपाशी असेल अशा व्यक्तीला खूप मोठया रकमेचे बक्षिस दिले जाईल.’

हया दवंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली. ही गोष्ट बिरबलपर्यंत पोहोचली. त्याने तो राहत असलेल्या गावातील एका गरीब व्यक्तीला आपल्या जवळ बोलवून राजदरबारात जाण्यास सांगितले. तसेच राजाच्या प्रश्नांना कशी उत्तरे दयावी तेही सांगितले.  


बिरबलने एक मोठी खाट त्या माणसाला दिली व बोलला, ‘ही खाट तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाडयात जा. जाताना चुरमुरे खात खात जा. माझ्या सूचनेप्रमाणे राजाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे दे.’

बिरबलने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने खाट आपल्या डोक्यावर ठेवली व राजवाडयाकडे जाण्यास निघाला. दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे व चुरमुरे खात चालला होता. अशा मजेदार माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले. जेव्हा तो म्हणाला महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षिस घेण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर त्याला दरबारात सोडण्यात आले.

तो राजदरबारात त्याच पध्दतीने गेला. त्या मजेदार माणसाला बघून अकबर बोलला, ‘कोण आहेस तू?’

‘मी एक माणूस आहे.’ तो बोलला.

‘अच्छा! मग तू असा डोक्यावर खाट ठेऊन का आला आहेस?’ अकबरने विचारले.

तो बोलला, ‘महाराज! ही तुमचीच घोषणा आहे, की तुम्ही अशा व्यक्तीला बक्षिस देणार आहात जो सावलीतही नाही व उन्हातही नाही. त्यामुळे मी ही खाट माझ्या डोक्यावर ठेवली आहे. मी सावलीतही नाही व थेट सुर्यप्रकाशातही नाही.’

त्यानंतर त्याने त्याच्या तोंडात चुरमुरे कोंबले. अकबर बोलला ‘हे काय आहे? तू राजदरबारात का खात आहे?’

तो म्हणाला, ‘महाराज! ही कृती तुमच्याच घोषणेचा एक भाग आहे. मी खात आहे तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही कारण मी खूप भूकेलेला आहे.’

हे सर्व ऐकून अकबर कुतुहलाने बोलला, ‘सांग मला, तुला हे सर्व कोणी शिकविले?’

‘महाराज! काही महिन्यांपासून आमच्या गावात एक अनोळखी विव्दान व्यक्ती रहात आहे. त्याच्या सांगण्यावरूनच मी हे कार्य केले आहे.’ तो गावकरी माणूस भोळेपणाने बोलला.

अकबरला लगेच समजले की तो अनोळखी व्यक्ती कोण आहे ते. तो आनंदाने ओरडला, ‘मला बिरबल सापडला!’ त्यानंतर त्याने त्या माणसाला योग्य ते बक्षिस दिले. त्याने आपले काही दूत त्या गावात पाठविले व राजसन्मानाने बिरबलला परत आणले.

अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 4 - बिरबल सापडला - Birbal Sapadla


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 3 अकबर बादशहा आणि पोपट - Akbar Badshah Ani Popat


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 2  बिरबल काळा कसा झाला - Birbal Kara Kasa Jhala


अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)